धनगर समाजाच्या मागण्यांसाठी मुक्ताईनगरमध्ये धरणे आंदोलन; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा |
मुक्ताईनगर (ता. १८ सप्टेंबर २०२५) –अतिक खान!मुक्ताईनगर
धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जय मल्हार सेनेच्या वतीने आज मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान तहसीलदारांना निवेदन देत समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी मेंढपाळांच्या वाड्यांवर वाढते दरोडे, मेंढ्या चोरीचे प्रकार, महिलांवरील अत्याचार, पोलिसांची निष्क्रियता, बंदुकीचा परवाना, तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून आरक्षण लागू करण्याची मागणी ठासून मांडली.
जय मल्हार सेनेचे पदाधिकारी म्हणाले,
"गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात मेंढपाळांवर दरोडे आणि अत्याचार वाढले आहेत. पोलिस कारवाई निष्क्रीय आहे. आरोपींवर दरोड्याचे कलम लावून तात्काळ अटक व्हावी," अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन भाजपकडून निवडणुकीपूर्वी दिले होते, मात्र ठोस निर्णय न झाल्याने समाजात नाराजी आहे. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र हजारो बैठका झाल्या तरी तो निर्णय अमलात आलेला नाही. ही फसवणूक आहे," असे आंदोलकांनी स्पष्ट केले.
स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना
मेंढपाळांच्या सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना देण्यात यावा, अशी मागणीही या आंदोलनातून जोरदारपणे करण्यात आली. "दरोडेखोरांपासून स्वसंरक्षणासाठी ही गरज अत्यावश्यक आहे," असे जय मल्हार सेनेचे नेते म्हणाले.
राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने १५ दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जय मल्हार सेनेने दिला.
या आंदोलन स्थळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी जय मल्हार सेना राष्ट्रीय अध्यक्ष लहुजी शेवाळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रवी पवार, जिल्हाध्यक्ष मिठाराम ठेलारी, तसेच विजय सावळे, दीपक चिंचोले, सचिन धनगर, जितेंद्र जुमळे, नरेंद्र पवार, सिताराम बिचकुले यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.