अस्मानी संकट
चिखली तालुक्यामधील शेतकरी त्रस्त; नदी-नाले तुडूंब भरले
तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा चिखली तालुक्याला जोरदार तडाखा बसला आहे. या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, पालेभाज्या व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. परिणामी ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
तालुक्यातील शेतकरी तीन चार वर्षांपासून कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहेत. यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाल्याने तसेच समाधानकारक पाऊस झाल्याने पिके सुस्थितीत होती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणार शहरासह तालुक्यात तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने जोर धरला आहे. सकाळपासून पावसाचे वातावरण नसतानाही दुपारनंतर अचानक आकाशात ढग दाटून येऊन विजांच्या कडकडाटासह कमी वेळातच जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. संपूर्ण पावसाळ्यात नदी-नाले कधीही तुडुंब भरून वाहिले नाहीत. मात्र, सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ते तुडूंब भरून वाहताना दिसत आहेत.
मंगळवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळपासून आकाश निरभ्र होते. मात्र, दुपारनंतर चार ते पाच वाजेदरम्यान अचानक आकाशात ढग जमा होऊन ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाच्या शेतातून पाण्याचे लोट वाहताना दिसून आले. घो-धो पावसामुळे ग्रामीण भागातील सखल भागात सर्वत्र पाणी साचून राहिले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तालुक्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन कापणीला काही दिवसानंतर सुरुवात होणार आहे.
ग्रामीण भागात सर्वत्र पाणी चिखली तालुक्यामधील किन्होळा , ब्रह्मपुरी , गिरोला , सवना, केळवद या भागामध्ये पावसाचा कहर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. काही भागात अतिवृष्टी झाली आहे.
जोरदार पावसामुळे अनेक भागातील शेत शिवारात पाणी साचले आहे. तसेच परिसरातील ओढ्यांनाही पाणी आले आहे. दरम्यान, पावसामुळे झालेल्या या नुकसानीची पाहणी करून शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पंचनामे करून मदत द्यावी
तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करण्यात यावेत. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. -सरपंच किन्होळा अर्चना वसंत जाधव