खामगांव-जालना रेल्वे प्रकल्पाला मान्यता द्यावी ; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेवून केली आग्रही मागणी |
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : बहुप्रतिक्षित खामगांव-जालना रेल्वे मार्गाच्या कामाला त्वरीत मान्यता प्रदान करावी, अशी आग्रही मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैश्णव यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांची भेट घेऊन केली आहे.
खामगांव-जालना हा रेल्वे मार्ग व्हावा अशी अपेक्षा बुलढाणा लोकसभा मतदार संघातील नागरिकांची आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगांव येथे झालेल्या जाहीर सभेत हा प्रकल्प जलद गतीने पूण करण्याचे आश्वासन दिले होते. राज्य सरकारने १५ मार्च २०२४ रोजी या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या ५० टक्के खर्चाला मंजुरात प्रदान करुन हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडे पाठविला आहे.
या रेल्वेमार्गाच्या प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेऊन या प्रकल्पाला मंजुरात प्रदान करावी, अशी मागणी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली आहे. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनीही सकारत्मकता दर्शविली असल्याची माहिती ना. जाधव यांनी दिली.