पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी |
बुलडाणा, दि. 26 सप्टेंबर (जिमाका): राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांनी आज तालुक्यातील नळकुंड, मलकापूर तालुक्यातील दाताळा, जांबुळ धाबा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. मागील जून ते ऑगस्ट महिन्यातील अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई वितरित केली जात आहे. सप्टेंबर महिन्यात गेल्या काही दिवसात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन घ्यावे. नदीजकवळील खरडून गेल्या जमिनी व वाहून गेलेल्या शेतीपूरक साहित्य, जनावरे आणि पडझड झालेल्या घरांची नोंद करुन घ्यावी.आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, असे आश्वस्त करत पालकमंत्री ना. पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
यावेळी आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, शरद पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, तलाठी आदी अधिकारी व कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.