प्रतिनिधी : धनराज मांडवकर, मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील विविध गल्ली-बोळांमध्ये शेणाचे उकिरडे पडून राहिले आहेत. या उकिरड्यांकडे ग्रामपंचायतीकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरात अस्वच्छता पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
या ठिकाणी निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे मच्छर आणि डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी गावात टायफॉईड, मलेरिया, कावीळ यांसारख्या साथीचे आजार पसरू लागले आहेत. अनेक नागरिक आणि लहान मुले या आजारांनी त्रस्त झाले असून ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
याशिवाय, गावातील गटारींची स्वच्छता देखील चार-चार महिन्यांपासून होत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. गटारी बंद पडल्यामुळे पाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे. गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने स्वच्छता मोहीम राबवून गाव स्वच्छ ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच ग्रामपंचायतीने जनतेच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे तत्काळ लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

