![]() |
अभयारण्या लगतच्या शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान; वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला |
मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी –
वाघ्र्य अधिवास क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुक्ताई–भवानी अभयारण्यालगतच्या शेतकऱ्यांचे संकट अधिकच वाढले आहे. रात्री रानडुक्करे, हरीण आणि सांबरांचे कळप शेतात घुसून पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, शेतकरी वर्ग नुकसानभरपाईसाठी वनविभागाकडे ऑनलाईन अर्ज करीत आहेत.
मात्र, वनविभागाकडून मिळणारी भरपाई व प्रत्यक्ष झालेले नुकसान यामध्ये मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. "आधीच नैसर्गिक आपत्ती, रोगराई यामुळे पिकांचे नुकसान होत असते, त्यातच वन्यप्राण्यांचा उपद्रव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे," असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच वर्षभरात वारंवार नुकसान होऊनही फक्त एकदाच भरपाईसाठी अर्ज करता येतो, याबाबतही शेतकरीवर्ग नाराज आहे.
वनचराई थांबली, कुरणे नष्ट झाली
मुक्ताई–भवानी अभयारण्यात वाघ, बिबट्या यांसारख्या हिंस्र प्राण्यांसह तृणभक्षक प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पारंपारिक कुरणे नष्ट होऊन जंगल परिसरात रानतुळस, तरोटा यांसारखी वन्यप्राण्यांना न खाता येणारी झुडपे वाढल्यामुळे हे प्राणी शेतशिवाराकडे वळत आहेत.
सौर ऊर्जा कुंपणावर शेतकऱ्यांचा भर
काही शेतकऱ्यांनी यापूर्वी सौर कुंपणासाठी वनविभागाकडे मागणी केली होती. तत्कालीन अधिकाऱ्यांनी याबाबत प्रयत्नही केले होते; मात्र सौर झटका मशीनचे वाटप अन्यत्र झाल्याने मुक्ताई–भवानी परिसरातील शेतकरी वंचित राहिले. निधीही उपलब्ध होऊनही त्याचा उपयोग न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
सध्या परिसरातील शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे की, वन्यप्राण्यांना आळा घालण्यासाठी विनाअट सौर ऊर्जा कुंपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. अन्यथा शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर संकट निर्माण होईल