मलकापूरात प्रहार जनशक्ती पक्षाचा आक्रमक जाहीर निषेध – चक्का जाम आंदोलनात विविध पक्षांचा सहभाग
मलकापूर – Viral News Live
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांवरून प्रहार जनशक्ती पक्षाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर एकाच वेळी चक्का जाम आंदोलन छेडण्यात आले.
मलकापूर तहसील चौकात सकाळी ११ वाजल्यापासून प्रहार जनशक्ती पक्षासह अनेक राजकीय व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे”, “कर्जमाफी तातडीने अंमलात आणा”, “कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला – राजीनामा घ्या” अशा घोषणा परिसरात घुमत राहिल्या.
दरम्यान, अधिवेशन काळात विधान भवनात कृषी मंत्री रमी खेळताना दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले. याच्या प्रतीकात्मक निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी तहसील चौकात पत्ते खेळले आणि पत्ते फेकून शासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.
या चक्का जाम आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाबरोबरच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन यांसारख्या अनेक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर आणि अपंग बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली, तर स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्कता बाळगली. प्रहार जनशक्ती पक्षाने सरकारला स्पष्ट इशारा दिला की शेतकरी व दिव्यांग बांधवांच्या मागण्यांवर लवकर निर्णय न झाल्यास राज्यभरात आणखी उग्र आंदोलन उभारले जाईल.