| डॉ. सांदिपान गुरुनाथ जगदाळे (लातुर) |
| डॉ.नीलाक्षी सुभाष जैन (मुंबई) |
प्रा. पुरुषोत्तम बाळासाहेब पवार (बारामती)
Mumbai, September 5 अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच
शिक्षण हे व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक
या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी
आज केलं. शिक्षकदिनाच्या निमित्ताने, नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक
पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. या पुरस्कारविजेत्या शिक्षकांमध्ये शिक्षिकांची,
तसंच ग्रामीण भागातल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे, याचा आवर्जून उल्लेख राष्ट्रपतींनी
केला. उपेक्षित वर्गांतली मुलं शिक्षणाच्या जोरावर यशाची शिखरं गाठू शकतात आणि त्यांच्या
या भरारीला बळ देण्यात प्रेमळ आणि निष्ठावंत शिक्षकांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची
असते, असं राष्ट्रपतींनी नमूद केलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातल्या तरतुदींचा उल्लेख
करून स्मार्ट फळा, स्मार्ट वर्गखोल्यांबरोबरच स्मार्ट शिक्षक सर्वात महत्त्वपूर्ण आहे,
अशी ग्वाही राष्ट्रपतींनी दिली. मुलींच्या शिक्षणातली गुंतवणूक ही कुटुंब, समाज आणि
देशाच्या उभारणीत अनन्यसाधारण भूमिका बजावते, असं प्रतिपादन त्यांनी केलं. आधुनिक भारताच्या
उभारणीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्या म्हणाल्या, गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षण, तसंच स्टेम, अर्थात
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रांमध्ये मुलींचा सहभाग वाढत
असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षकांच्या योगदानाच्या बळावर भारत जागतिक पातळीवर ज्ञानाचं
भांडार म्हणून उभा राहील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रपतींनी
देशातल्या ६६ शिक्षकांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान केले. नांदेडचे डाॅ.शेख
मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीउद्दीन, लातुरचे डाॅ.सांदिपान गुरुनाथ जगदाळे, मुंबईच्या
डाॅ.नीलाक्षी सुभाष जैन आणि बारामतीचे प्रा. पुरुषोत्तम बाळासाहेब पवार या महाराष्ट्रातल्या
शिक्षकांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री
जयंत चौधरी आणि इतर यावेळी उपस्थित होते.
