मुक्ताईनगर प्रतिनिधी ।
मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत ४१ वर्षीय शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शेतात काम करत असताना जमिनीवर पडलेल्या बेवारस इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्यानं ही दुर्घटना घडली.
मृत शेतकऱ्याचे नाव एकनाथ जगन्नाथ कांदले (वय ४१, रा. रुईखेडा) असे असून, ते बटाईने घेतलेल्या शेतात काम करत असताना हा प्रकार घडला. अचानक विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी हलवण्यात आला. तपासणीत मृत्यूचे कारण विजेचा धक्का असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय पवार पुढील तपास करीत आहेत.
कांदले यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.